Friday 10 March 2017

शाक्त्यवीरस्य पराक्रम।

११ मार्च १६८९....




आणि अखेरीस ४२ दिवसांच्या अन्वित अत्याचारानंतर भिमा-भामा-इंद्रायणीच्या त्रिवेणी संगमानजिक औरंगजेबाच्या जल्लादांनी शंभुराजांचे मस्तक निर्ममपणे कलम केले. ढोलताशांच्या जल्लोषात भाल्याच्या फाळावर रोवलेलं शंभूराजेंचं मस्तक उंचावून मोगली सैनिक अत्यानंदाने नाचत होते.
होय !
हेच ते मस्तक होतं जे सईबाईसाहेबांनी लहाणपणी अंगाईगीत गाऊन थोपटलं होतं.



हेच ते मस्तक होतं, जे आग्र्याच्या कैदेत आणि पन्हाळ्याच्या सज्जाकोठीत आबासाहेबांनी पोटाशी धरून त्यावर अश्रूंचा अभिषेक केला होता.
हेच ते मस्तक होतं, जे जिजाऊसाहेबांनी अनेकवार प्रेमभरानं कुरवाळलं होतं.
आज त्याच मस्तकाला भाल्याच्या फाळ टोचत होते.



डोळ्यांच्या खाचा झालेल्या शंभुराजांच्या मस्तकातून रक्त ठिबकत होतं.
नेत्रहीन, मुकूटहीन छत्रपतींचे हे रूप पाहून इंद्रायणी भीमेला बिलगून मुसमुसू लागली.
भामाही आवाक होऊन हे दृष्य पाहून भावनाविवश झाली.
शंभूराजांच्या मस्तकातून ठिबकणार्या रक्तचा एक थेंब भीमेच्या डोहात पडला आणि त्या रूधीरस्पर्शाने भीमा थरारून उठली. जिच्या तीरावर महाराष्ट्र क्षात्रधर्म पिढ्यानपिढ्या जोपासला गेला त्या भीमेचा रूधीरस्पर्शाने कायापालट झाला...
आणि चमत्कार घडला.



या भीमेचे जलप्राशन करताच इथल्या चिमण्यांना गरूडाचे पंख फुटू लागले,काटेरी झाडांनी त्रिशूलाचे रूप धारण केलं. भीमथडी तट्टूंच्या मुखातून सिंहगर्जना बाहेर पडू लागल्या आणि हर हर महादेव गर्जत अवघा महाराष्ट्र आता मोगली तख्तावर अखेरचा घाव घालण्यासाठी सिद्ध झाला.



औरंगजेबाला वाटले आपण आता संपुर्ण हिंदवी स्वराज्य गिळंकृत केले, पण नाही उलट शंभुराजांच्या बलिदानाने मराठ्यांच्यात ओरंगजेबाविरूद्ध लढण्याचे त्वेष निर्माण केला.



शंभूराजांच्या नेत्रांच्या खाचांच्या अंधारातच मराठ्यांना नवा प्रकाश दिसला.
शंभराजांच्या अखेरच्या मौनानंच महाराष्ट्र धर्म वाढविण्याचा महामंत्र पुन्हा बोलका झाला.



शंभराजांचं तोडलेलं मस्तक सुदर्शन चक्राप्रमाणे औरंगजेबी छावणीभोवती गरगरत राहून मोगलांना भयभीत करू लागलं.
औरंगजेबानं शंभूराजेंचे डोळे फोडले म्हणून मराठ्यांनी स्वप्न पाहणं थांबवलं नाही.



शंभराजांचे बाहू तोडले मराठ्यांचे बाहूबल कमी झालं नाही शंभूराजांचे पाय तोडले म्हणून मराठ्यांची अगेकूच  थांबली नाही. शंभूराजांचे मस्तक तोडलं म्हणून हिंदवी स्वराज्याचा मुकूट छेदला गेला नाही.
शंभराजांच्या अस्थीमधून अवघा महाराष्ट्र वज्रप्राय झाला.मातीच्या गर्भातून दडपलेल्या स्वप्नाला पुन्हा पालवी फुटून ते आकाशाला कवटाळू लागलं.



शंभूराजांनी स्वत:च्या रूधीराने प्रज्वलीत केलेल्या या यज्ञकुडांने औरंगजेबाच्या स्वप्नांची मात्र पार  राखरांगोळी होऊन गेली.
काळाबरोबर नि:शेष झालं ते शंभराजांचं कलेवर.
कलेवर नष्ट झालं असलं तरी त्यांचा मृत्यूंजयी आत्मा मात्र आकाश झाकू पाहणार्या औरंगजेबी झेंड्याला भेदून ध्रूव तार्यासारखा अढळपद प्राप्त करून बसलेला आहे.




जय रौद्र शंभो.
राजा शंभूछत्रपती.